माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा जावई म्हणून मला कुणीही संबोधू नये, अशी विनंती हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी कौटुंबिक त्रासाला कंटाळून घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. कुटुंब न्यायालयात संजना जाधव यांच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती जाधवांनी दिली.
कौटुंबिक त्रासाला कंटाळलो आहोत, रावसाहेब दानवे यांच्यामुळेही त्रस्त झाल्यामुळे घटस्फोटाचा निर्णय घेतल्याची माहिती हर्षवर्धन जाधव यांनी दिली. आपल्या जीवाला धोका असल्याचा पुनरुल्लेख हर्षवर्धन जाधव यांनी केला. हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेत आपल्या पत्नीच्या हाती राजकीय सूत्र सोपवत असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते
रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत खैरे दोघे मिळून आपल्याला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला होता. “रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी ‘हर्षवर्धन वेडा आहे’ हे सिद्ध करायचा विडा उचलला आहे. एकदा हे सिद्ध झालं तर मग तो काहीही बोलला तरी फरक पडणार नाही, असं त्यांचं षडयंत्र सुरु आहे”, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला होता.