मुंबई : औरंगाबाद महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजण्याआधीच शहरातील राजकारण प्रचंड तापायला लागलं आहे. औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामकरण करण्यात यावं, अशी भूमिका शिवसेनेची आहे. मात्र, या नामकरणाला सत्ताधारी पक्षातील काँग्रेसचा विरोध आहे. औरंगाबाद शहरातील शिवसेनेचे दिग्गज नेते चंद्रकांत खैरे यांनी नामकरणावरुन आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा नामकरणाला विरोध आहे.
त्यामुळे औरंगाबाद शहराच्या नामकरणावर मंत्रिमंडळातील नेत्यांचं एकमत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. नामकरणाबाबत आतापर्यंत फक्त शिवसेना आणि काँग्रेसची भूमिका समोर आली होती. मात्र, आता राष्ट्रवादीचीदेखील भूमिका समोर आली आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत भाष्य केलं. “औरंगाबाद शहराचं नामकरण हा महाविकास आघाडी सरकारच्या अजेंडावरील विषय नाही. त्यामुळे प्रश्नच येत नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नामकरणावर काँग्रेसची नेमकी भूमिका काय?
बाळासाहेब थोरात यांनी दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद शहराच्या नामकरणावर प्रतिक्रिया दिली होती. नाव बदल हा आमचा कार्यक्रम नाही. नाव बदल आणि अशा प्रकारच्या गोष्टींना आमचा विरोध राहील, असं थोरात म्हणाले होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही. विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील.
महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे. औंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मी इकडे आलोय. शेतकऱ्यांना आम्ही मोठी मदत केली, चक्रीवादळात आणि अतिवृष्टीत आम्ही मोठी मदत केली. आम्ही स्वबळाची तयारी करत आहोत. पण, भाजपला रोखण्यासाठी काही तडजोड करावी लागली तर विचार केला जाईल, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं होतं.
ईडीचा वापर करुन दबाव आणण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही : नवाब मलिक
दरम्यान, नवाब मलिक यांनी यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने नोटीस देण्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारचा ईडीचा वापर करुन दबाव आणण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली आहे.
“वर्षा राऊत किंवा इतर राजकीय व्यक्ती असतील त्यांना समन्स आले असतील तर चौकशीलसा सामोरं जावं लागेल. समोर जाणं म्हणजे काही चूक केली असं होत नाही. ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील”, असं मलिक म्हणाले.
“ईडीचा वापर केंद्र सरकार करते हे आता लपून राहिलेलं नाही. ही पद्धत योग्य नाही. केंद्र सरकार अशा यंत्रणांचा वापर करून दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर तो यशस्वी होणार नाही”, असं नवाब मलिक म्हणाले.
Read Also :
- ठाकरे सरकारची लगबग : औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ करण्याचा प्रस्ताव सादर
- पत्नी गौरी गडाख यांच्या आत्महत्येनंतर प्रशांत गडाख यांना कोणाचा आधार?
- औरंगाबादेत साखर सहसंचालकांविरोधात दारूची बाटली, मटण देऊन अनोखं आंदोलन
- औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये ‘नुरा कुस्ती’ सुरू आहे – फडणवीस
- ‘संभाजीनगर’चा वापर केवळ निवडणुकीपुरता’, देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा
- ‘घरातली उणी धुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा’,नितेश राणेंचं शिवसेनेवर टीकास्त्र