इचलकरंजी : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र राज्य सरकार याकडे साफ कानडोळा करत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारला जागं करण्यासाठी रयत क्रांती संघटना जागरण गोंधळ आंदोलन करणार असल्याची घोषणा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार व बागायतदारांना 1 लाख रुपये मिळावेत तसेच शेतकऱ्यांचे चालू पीक कर्ज माफ व्हावे, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी सरकारकडे केली. येत्या 22 तारखेला सरकारला जागे करण्यासाठी कोल्हापुरात रयत संघटनेच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन हाती घेणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.
शाहूवाडी तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शाहूवाडी तालुक्याचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या. शाहूवाडीच्या शेतातील भात पिकाची पाहणी करून प्रत्यक्ष शेतकऱ्यांबरोबर बांधावर जाऊन सदाभाऊ खोत यांनी संपर्क साधला. सत्तेवर आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली होती ती त्यांनी पाळावीत, असा सल्ला सदाभाऊंनी मुख्यमंत्र्यांना दिला.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे परतीचा पाऊस झाल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जागतिक महामारीच्या काळात जनता धैर्याने लढली. परंतु शासकीय यंत्रणा कोलमडली. आता परतीच्या पावसाने बळीराजा उध्वस्त झाला आहे. झालेल्या नुकसानीचे सर्व पंचनामे योग्यपणे करून कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही याबाबत सरकारने खबरदारी घ्यावी आणि तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत करावी, असं खोत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा सौलापूर दौरा
अतिवृष्टीचे संकट टळेपर्यंत नुकसानभरपाईसंदर्भात कोणताही निर्णय घाईने घेतला जाणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटीनंतर आणि पाहणी दौऱ्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. सध्या आम्ही माहिती घेण्याचे काम करत आहोत. विविध भागांत नुकसानीचे पंचनामेही सुरु आहेत. या सगळ्याचा अंदाज घेतल्यानंतर प्रत्यक्ष मदत जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीसांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दुपारपर्यंत हे दौंड-बारामती भागात होते. त्यानंतर भिगवण, इंदापूर, करमाळ्याचा त्यांनी दौरा केला. “सरकारने मदत द्यावी म्हणून सरकारवर दबाव निर्माण करु. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्य समजून घेतलं पाहिजे. विरोधात असताना आणि आमच्यासोबत असताना ते मागण्या करायचे. आता त्यांना ईश्वराने मदतीसाठी शक्ती दिली आहे. त्यांनी तातडीने मदत करावी. तातडीने मदत करण्यासाठी काहीही लागत नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Read Also :
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाता कामा नये अन्यथा रस्त्यावर उतरू, खासदार नवनीत राणा यांचा इशारा https://t.co/h8B15Nj8pz#MPnavneetranakaur #MaharashtraFlood
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 19, 2020