राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले, यात महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपा आपणचं नंबर वन असल्याचा दावा करत आहे. राज्यात ५ हजार ७०० हून अधिक ग्रामपंचायतीवर भाजपानं सत्ता आणल्याचं पक्षाकडून सांगण्यात येत आहे. परंतु महाविकास आघाडीला ग्रामीण जनतेने कौल दिला आहे असं सत्ताधारी पक्षाचे नेते सांगत आहेत. ग्रामपंचायत निकालांचे दावे-प्रतिदावे केले जात असताना यातच पुण्यात एका राजकीय चर्चेने भाजपाची झोप उडाली आहे.
पुणे शहरातील 19 नगरसेवक भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत पुण्यात भाजपला मोठं यश मिळालं होतं. भाजपचे तब्बल 98 नगरसेवक निवडून आले होते. महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेतून मोठी इनकमिंग भाजपात झाली होती. मात्र यातीलच काही नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, भाजपाचे खासदार गिरीश बापट आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या चर्चांना अफवा असल्याचं सांगत खंडन केले आहे. भाजपाचा एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही, त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही. कुणीतरी मुद्दाम अशाप्रकारे बातम्या पसरवत आहेत, ज्यात काही निष्पन्न होणार नसल्याचं बापट आणि मुळीक यांनी म्हटलं आहे.