मुंबई : ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेली शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावत मोठा निर्णय दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील १६ आमदारांना पात्र ठरवण्यात आलं आहे. तसेच खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचा मोठा निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. त्यावरून आता राज्यातून खोचक प्रतिक्रिया समोर येत आहे. यातच आता खासदार संजय राऊतांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असं महत्वाचं विधान खासदार संजय राऊतांनी केलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना महाराष्ट्राबाबत मोठा निर्णय घेण्याची संधी चालून आली होती. परंतु या व्यक्तींनी देखील महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या प्रकरणाची स्क्रिप्ट दिल्लीवरून आली होती. तसेच बाळासाहेबांची शिवसेना चोरमंडळाकडे कुणी दिली? असा सवाल करत लोकं त्यांना सोडणार नाही. अशी टिका देखील संजय राऊतांनी केली आहे.
शिवसेना अपात्र आमदारांच्या निकालावर आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यापुढे कायदेशीर लढाई करणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. तर २०२४ ला भाजपला संविधान बदलायचं आहे. अशी सडकून टिका आदित्य ठाकरे यांनी केलीय. दरम्यान, खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिल्याने धुळ्यात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल जाहीर केल्यानंतर धुळ्यात राहुल नार्वेकर यांचा लोकशाहीचा खुनी अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे.