नागपूर: क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार मतदारसंघातील सरकारी बैठकांमध्ये बोलू देत नाही. बोलण्याचा प्रयत्न केल्यास अपमानास्पद वागणूक देतात. यामुळे कामठी विधानसभा मतदारसंघाचे आमदार टेकचंद सावरकर चांगलेच भडकले आहेत. आता आपण गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
लॉकडाउन खुलल्यानंतर आमदार केदार यांनी मौदा व कामठी तालुक्यातील रखडलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. कामठी मतदारसंघाचे आमदार सावरकर आहेत. यावेळी रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, माजी अध्यक्ष सुरेश भोयर, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, मुख्याधिकारी योगेश कुंभेजकर, सभापती तापेश्वर वैद्य, नेमावली माटे, उज्वला बोढारे, भारती पाटील, सरपंच, प्रशासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सावरकर यांच्यासाठी आठव्या क्रमांकावर खुर्ची ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्यांचा पारा आधीच वाढला होता. मंत्र्यांचे दोन विषय आटोपल्यावर सावरकर यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना बोलू देण्यात आले नाही. त्यामुळे निषेध नोंदवून ते बैठकीतून निघून गेले. यापूर्वीसुद्धा केदार यांनी घेतल्या बैठकीला सावरकरांना बोलावण्यातच आले नव्हते. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावरून नाराजी जाहीर केली होती. यावेळी बैठकीला बोलावले मात्र पहिल्या जिल्हा परिषदेच्या सभापतींच्या नंतर त्यांची खुर्ची ठेवली होती.
आमदार सावरकर म्हणाला की, सुनील केदार दादागिरी करतात. आमदार या नात्याने सरकारी बैठकांना बोलावणे आपणास प्रोटोकॉलनुसार आवश्यक आहे. सरकारी बैठका पक्षाच्या नसतात. मात्र, त्यांना विरोधकांचा राग आहे. आमचे बोलणेही आवडत नाही. आमदार म्हणून आपण पहिल्यांदा निवडून आलो असलो तर जिल्हा परिषदेत आपण सातवेळा निवडून आलो आहो. यापुढे आपण शांत बसणार नाही.