जालना : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र आणि भाजप आमदार संतोष दानवे यांनी जालना जिल्हा कार्यकारिणी जाहिर केली. मात्र या कार्यकारिणीत दानवे गटातील सदस्यांची संख्या सर्वाधिक असल्याचा आरोप आमदार बबनराव लोणीकर गटाने केला आहे.
जिल्हा कार्यकारणी निवडीवरून कार्यकर्ते प्रचंड संतापले असून लोणीकर आणि दानवे यांच्यातील अंतर्गत वादा बरोबरच कुरघोडी या बैठकीवरुन समोर आली आहे. जिल्हा कार्यालयात लोणीकर यांनी पुन्हा बैठक घेऊन नवीन कार्यकारिणी जाहीर केल्याने लोणीकर-दानवे गट आमनेसामने आले आहेत.
आमदार संतोष दानवे यांनी एकतर्फी निर्णय घेऊन कार्यकारिणी जाहीर केल्याचा आरोप बबनराव लोणीकर यांनी केला आहे. तर भाजपमध्ये हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही. दानवे यांच्या हुकुमशाहीमुळे पक्षाचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली शेजुळ यांनी केला आहे.
जिल्हाध्यक्ष संतोष दानवे यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीत भोकरदन, जाफराबाद, जालना, बदनापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा अधिक भरणा असून लोणीकर यांनी परतूर आणि मंठा, जालना या तालुक्यातील कार्यकर्त्यांचा अधिक भरणा जिल्हा कार्यकारिणीत केला आहे.