जळगाव – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडी नोटिसीविषयी ‘सामना’त अग्रलेख लिहण्यात आला होता. ‘डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य’ अशा शब्दात चंद्रकांत पाटलांवर ‘सामना’तून बोचरी टीका करण्यात आली होती. यावर आता मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या व केलेल्या कमरेखालच्या घाणेरड्या वक्तव्यावर दिवसभर चर्चा करणे एवढेच काम सध्या राज्यातील सरकारचे सुरू आहे. गेल्या वर्षभरात जनतेच्या विकासाचे सांगण्यासारखे एकही काम उध्दव ठाकरे यांच्या सरकारकडे नाही असा टोला राज्याचे माजी जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी लागवला आहे.
नवीन वर्षाच्या त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘नवीन वर्ष कोरोनामुक्त जावो हीच सदिच्छा’ त्यांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारबाबत बोलतांना गिरीश महाजन म्हणाले, ”गेल्या वर्षभरात सरकारने जनतेचे एकही काम केले नाही. संजय राऊत यांच्या घाणेरड्या वक्तव्यावर हे सरकार आपले दिवस काढत आहे. राऊतांनी विरोधकांवर काही तरी लिहायचे, कमरेखालचे वक्तव्य करायचे आणि त्यावरच दिवसभर चर्चा करायची, एवढेच काम आपल्याला वर्षभरात दिसून आले आहे.
‘सरकार कोण चालवतंय हेच कळत नाही’, असा आरोप करून महाजन म्हणाले, कि शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार पूर्णपणे उदासिन असल्याचे दिसून येत आहे. कापूस खरेदी सुरू आहे, परंतु केवळ दहा टक्केच खरेदी सुरू आहे. दिवसाला ज्या ठिकाणी १५० गाड्या खरेदी करण्यात येत होत्या, त्यात आता केवळ पंधराच गाड्या कापूस खरेदी सुरू आहे. ‘मका‘खरेदीची हीच परिस्थिती आहे. आज शेतकऱ्यांच्या घरात कापूस व मका पडून आहे. परंतु हे सरकार खरेदी करण्यास तयार नाही. सिंचनाच्या कामासाठी या सरकारने कोणताही निधी उपलब्ध केलेला नाही, त्यामुळे राज्यातील सिंचनाची सर्व कामे बंद पडली आहे. या सरकारने मक्तेदारांचेही पैसे न दिल्यामुळे राज्यात अनेक कामेही बंद आहेत. याबाबत कोणाशी बोलावे तेच कळत नाही, कारण राज्यात सरकार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे चालवित आहेत कि कोण चालवित आहेत. हेच सध्या कळेनासे झाले आहे. यात मात्र जनतेचे प्रचंड हाल होत आहे.