“मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांवर अशी वेळ कधीही येऊ दिली नाही” असे म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केले आहे.
“शेतकऱ्यांवर युरिया खत ब्लॅकने घेण्याची वेळ आली आहे. ज्यादा दराने घ्यावे लागत आहे, पण तेही मिळत नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. मी कृषिमंत्री असताना अशी वेळ शेतकऱ्यांवर कधीही येऊ दिली नाही” असे खडसे म्हणाले.
“सरकारचे शेतकऱ्यांकडे अतिशय दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. साठेबहाद्दरांनी मोठ्या प्रमाणात युरिया साठवून ठेवल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे” असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.