जळगाव : महाराष्ट्रात सत्तांतरासाठी जुळवाजुळव पूर्ण झाली असून येत्या दोन महिन्यात भाजपची सत्ता आणण्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला होता. दानवेंनंतर आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी भविष्यवाणी करत हे सरकार 5 वर्ष टिकणार नसल्याचा दावा केला आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, राज्यातील सरकारमध्ये काहीही आलबेल नाही. हे सरकार 5 वर्ष पुर्ण करणार नाही. लवकर त्यांच्या कर्माने सरकार पडेल, अशी भविष्यवाणी त्यांनीही केली.
तीन पक्षांचे सरकार कसे चालले आहे, हे राज्यातील जनता पाहत आहे. कोणत्याही प्रश्नावर पक्षातील नेते आणि मंत्र्यांमध्ये एकमत नाही. त्यामुळे हे सरकार 5 वर्ष टिकणार नाही. स्वतःच्या कर्मानेच पडेल, असा दावा त्यांनी केला.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर बोलताना ते म्हणाले की, त्यांनी चुका केल्या असतील तर संस्थांनी कारवाई करायची नाही का ? त्यांनी चुका केल्या नसतील तर घाबरू नये.