मुंबई – भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आमदार प्रसाद लाड यांच्या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेची जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. त्यानिमित्ताने ही भेट तर नाही ना अशी चर्चा अध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.
प्रसाद लाड हे जवळपास पाऊण तास राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर होते. या दोघांमधील चर्चेचा तपशील अद्याप समजलेला नाही. मात्र कृष्णकुंजवरुन बाहेर येताच प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्यासोबतची भेट ही वैयक्तिक होती असं नमूद केलं. माझे आणि राज ठाकरे यांचे वैयक्तिक संबंध आहेत, असं प्रसाद लाड म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा, अशी बोलकी प्रतिक्रियाही दिली. आणि विशेष म्हणजे शिवसेनेची परंपरागत सत्ता खाली करण्यासाठी जे करता येईल ते करु, असा निर्धारही प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.
प्रसाद लाड यांच्या या वक्तव्यावरून येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्र येऊन महापालिकेवर असलेली शिवसेनेची सत्ता उलथवून टाकणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती करण्याचे भाजप नेत्यांकडून संकेत देण्यात येत असले तरी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबतच्या युतीचे वृत्त फेटाळून लावले होते. आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यापूर्वी स्पष्ट केलं होतं.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मध्यंतरीच्या काळात राज्यातील इतर निवडणुकांमध्ये शिवसेनेची घसरण झाली असली तरी आजवर सेनेचा मुंबई महानगरपालिकेचा किल्ला अभेद्य राहिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नाकावर टिच्चून महानगरपालिकेची आगामी निवडणूक जिंकायचीच, असा चंग यंदा भाजपने बांधला आहे. त्यामुळे प्रसाद लाड यांनी राज ठाकरेंशी घेतलेल्या भेटीनंतर मनसे आणि भाजप हे युती न करता शिवसेनेविरुद्ध छुपी लढाई करतील का असा प्रश्न देखील उपस्थित होतो.