मुंबई: देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला असून एका दिवसातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांपार गेली आहे. मात्र लसींचा तुटवडा, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि बेड्सच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. कोरोनाच्या कठीण काळातही आरोप – प्रत्यारोपांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात तर यावरून मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातच आज शिवसेनेच्या सामना या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोरोना काळातील मदतीच्या राजकारणावरून टीका करण्यात आली आहे.
सामनामध्ये पंतप्रधान मोदींवर करण्यात आलेल्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. सामनातील आजच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादावरून निशाणा साधण्यात आला. संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या, हेच मोदींच्या भाषणाचे सार होते, अशी टीका करण्यात आली होती. याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले असून, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून काही सवाल उपस्थित केले आहेत.
राज्य सरकारची #रेमडेसीव्हर ची मागणीच मुळात २६ हजार आणि केंद्र देत आहे पण राज्य सरकारच्या नेत्यांचा कांगावा ५० हजार हवेत दिले फक्त २६ हजार. राज्यातील नेत्यांचा अपयश लपवायचा नवा कांगावा pic.twitter.com/xGifkUhge0
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 22, 2021
देशात केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर मदत करत आहे . पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संकट काळात किती वेळा दिलासा द्यायला बाहेर पडले ? कोरोना लढाईत कोणती ठोस पावले उचलली? बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर यासाठी वर्षभर काय नियोजन केले? गोरगरिबांना काय मदत दिली? अशी प्रश्नांची सरबत्ती दुसऱ्या एका ट्विटमधून करण्यात आली आहे. वर्षभरातील बदल्या पाहा, त्याऐवजी आरोग्याकडे लक्ष दिले असते तर दुरवस्था झाली नसती , अशी मिस्कील टीका उपाध्ये यांनी केली आहे.