मुंबई: भाजपा प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आज ओबीसी, मराठा आरक्षणाबाबत चर्चा होणार आहे. तसेच राज्य सरकार वेळू मारुन नेण्याची भुमिका करत आहे. कोरोना काळात महाविकास आघाडीतील सरकारला राजकीय कार्यक्रम चालतात पण अधिवेशन चालत नाही, अशी टिका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली आहे.
अधिवेशन २ दिवसाऐवजी जास्तीत जास्त वेळ घेण्यात यावं
सरकारी पक्षाचे कार्यक्रम होतात, पण कोरोनाचे कारण सांगून अधिवेशन मात्र दोन दिवसांचं घेतलं जातंय. अधिवेशन दोन दिवसांचं आणि जिल्हा परिषद निवडणुका मात्र होतात, त्याला कोणता डेल्टा नाही ना कोणता व्हायरस, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला. सरकारमधील घोटाळे बाहेर येत आहेत. महाराष्ट्रात विद्यार्थी, महिला, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण याचा आक्रोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे अधिवेशनापासून पळ काढला जात आहे, जास्त दिवसांचं अधिवेशन घेण्याची मागणी आम्ही केली. जास्तीत जास्त दिवसाचं अधिवेशन घ्यायला लावावं, अशी मागणी राज्यपालांकडे केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको
“एकिकीडे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली असून, दुसरीकडे ५ जिल्हा परिषदा व ३३ पंचायत समित्यांची पोटनिवडणूक जाहीर करून, सरकारकडून ओबीसी समाजाचं नुकसान केलं जात आहे. यामध्ये एकही जागा ओबीसींकरता राखीव राहणार नाहीयेत. आम्ही राज्यपालांकडे या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली असून, आम्ही याबाबत आंदोलन छेडणार आहोतच. पण तरीही निवडणुका झाल्याच, तर या सर्व जागांवर आम्ही फक्त ओबीसी उमेदवार देऊ, मग जिंकलो-हरलो तरी पर्वा नाही. हे आरक्षण सरकारच्या नाकर्तेपणामुळ गेलं, ४०-५० वर्षात पहिल्यांदा असं झालं. त्यामुळे याबाबत देखील आम्ही राज्यपालांना विनंती केली आहे,” अशी आक्रमक भूमिका फडणवीस यांनी स्पष्ट केली. या शिष्टमंडळात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड, योगेश सागर, मनिषाताई चौधरी आणि इतरही नेत्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.