मुंबई : राज्यातील करोना परिस्थिती अजुनही कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून गंभीर परिस्थिती होताना दिसत असून, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. सरकारनं हात धुवायला सांगण्यापेक्षा काहीही केलेलं नाही, असा आरोप विरोधकांकडून म्हटलं जात आहे. विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिलं. सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीवेळी “करोनाशी लढण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे असे दिसते. विशेषतः ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही संकल्पना केवळ देशातच नव्हे, तर जगात नवीन आहे आणि ती महाराष्ट्रात यशस्वी होताना दिसतेय,” असं राऊत म्हणाले. या मुद्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,”मला तेच सांगायचंय की सर्वांनी खूप सहकार्य केले.
अगदी ही मोहीम राबवण्यात आपले डॉक्टर्स आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत. आशा, अंगणवाडी सेविका, त्यानंतर महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा, त्यानंतर स्वयंसेवी संस्था सगळ्याचंच यात अमाप योगदान आहे. की साधा विचार करा, आपल्या घरी दोनदा-तीनदा ही टीम गेली आहे आणि उंच बिल्डिंग असेल, लिफ्ट नसेल तरी पायपीट करून वर यायचं. चौकशी करायची.
कुणी करोनाग्रस्त आहे का? या मोहिमेतून जो माझा हेतू होता एक तर जनजागृती करणं, महाराष्ट्राच्या आरोग्याची एक तपासणी चौकशी करणं आणि ज्यास आपण एक हेल्थ मॅप म्हणतो, कसा आहे महाराष्ट्र, महाराष्ट्राचं आरोग्य कसं आहे? त्याच्यात आता बहुतेकांनी स्वतःहून सहव्याधींचीही माहिती दिली आहे. त्या कोणाकोणाला आहेत. मग कार्डिअॅक प्रॉब्लेम कुणाला आहे, डायबेटीस कुणाला आहे, कॅन्सर कुणाला आहे? इतर व्याधी कुणाला आहेत, किडनीचे विकार कुणाला आहेत? या सगळ्यांची आता आपल्याकडे नोंद झाली,” ठाकरे म्हणाले.
Read Also :
सूडाच्या मार्गाने जाण्यास आम्हाला भाग पाडू नका, मुख्यमंत्र्यांचा भाजपला इशारा
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर देहविक्री करणाऱ्या महिलांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा
“जनतेचं बहुमत नसतानाही…,” पंकजा मुंडेंची ठाकरे सरकारवर टीका
“सर्वोच्च आणि उच्च न्यायालयालासुद्धा ‘महाराष्ट्रद्रोही‘ ठरविणार का?,” फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल