काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बोलवलेली काल बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक काल पार पडली. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारला घाबरायचं की त्यांच्याविरोधात लढायचं याचा निर्णय आपल्याला घ्यायचा असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, घाबरायचं आहे की लढायचं हे आधी आपल्याला ठरवलं पाहिजे. अन्यथा आपण रोज भेटत राहू आणि अशाच चर्चा करत राहू, जर आपल्याला लढायचं असेल तर मग ते कोणत्याही किंमतीत केलं पाहिजे. ते विरोधी पक्षात आहेत किंवा ते इतर पक्षांबद्दल वाईट विचार करतात असं नाही. पण तेदेखील सर्वसामान्यांचे प्रतिनिधी आहेत.
उद्धव ठाकरेंनी या बैठकीत राज्यात बंद असलेल्या शाळांकडे देखील लक्ष वेधले. ते म्हणाले की, अमेरिकेत शाळा सुरु केल्यानंतर 97 हजार मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे रिपोर्ट आहेत. जर आपल्याकडे अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय करणार आहोत? कोरोना संकट लवकर टळावं आणि समोरासमोर बसून आपण चर्चा करावी अशी अपेक्षा आहे. जे काही करु ते एकत्र मिळून करु.