नितीन राऊत यांना जनतेला शॉक द्यायची सवय आहे. मात्र जनता लवकरच तुम्हाला शॉक देईल. जनता सर्व काही बघत आहे, लक्षात ठेवा. असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नितीन राऊत यांना दिला आहे. वाढीव बिजबिलावरून चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणारे वसई विरार क्षेत्राचे आमदार आणि बहुजन विकास आघाडी पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना जे 5.5 लाख रुपये विजेचे बिल आले आहे ते भरण्यास त्यांनी नकार दिला. आश्चर्याची बाब म्हणजे हे बिल त्यांना बंद असलेल्या शाळा आणि महाविद्यालयाचे आले आहे. तसेच वसई विरार मधील नागरिकांना हितेंद्र ठाकूर यांनी आवाहन केले आहे की कोणीही असे चुकीचे वीज बिल भरू नका, ऊर्जामंत्र्यानी हे वाचले नाही का असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी विचारला.
पुढे बोलताना ते म्हणाले, वीजबिलं वाढलेली नाहीत, तर लोकांचा तसा समज झालाय.” असे राज्याचे ऊर्जामंत्री सांगत असल्याची बातमी वाचनात आली. हे वाचून महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी अत्यंत वाईट वाटले. हे जोडून तोडून तयार झालेले तिघाडी सरकार संपूर्णपणे नागरिकांप्रती असलेली आपली जबाबदारी विसरले आहे.