मुंबई : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर प्रलंबित असलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. अकरावीची दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच 26 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. मराठा आरक्षित जागांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या गटात प्रवेश देण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र मराठा समाजामध्ये या निर्णयामुळे रोष दिसून येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारचा मराठा समाजाप्रती असलेला द्वेष सारखा दिसून येत आहे. सरकार पुन्हा पुन्हा मराठा विद्यार्थ्यांचा विश्वासघात करत असल्याचे म्हणत जोरदार टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील ट्विट करत म्हणाले की, ठाकरे सरकारचे सर्वच निर्णय मराठा समाजासाठी धक्कादायक ठरत आहेत. सर्व संघटनांनी एकत्र येऊन जर निर्णय घेतला, तर भाजपा या आंदोलनाचं नेतृत्व करण्यास तयार आहे.
राज्य सरकारचा मराठा समाजाप्रति असलेला द्वेष सारखा दिसून येत आहे. सरकार पुन्हा पुन्हा मराठा विद्यार्थ्यांचा विश्वासघात करत आहे. यांचे सर्वच निर्णय मराठा समाजासाठी धक्कादायक ठरत आहेत. सर्व संघटनांनी एकत्र येऊन जर निर्णय घेतला, तर भाजपा या आंदोलनाचं नेतृत्व करण्यास तयार आहे. pic.twitter.com/IG5XNaI0Jj
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) November 25, 2020
राज्य सरकारने मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचं मातेरं केलेलं आहे. मराठा समाजाला आता एमएसइबीमध्ये नोकऱ्यासाठी खुल्या प्रवर्गातून अर्ज करावे लागतील, असा गोंधळ राज्य सरकारने करून ठेवला आहे. नितीन राऊत यांनी शिक्षणातलं एसईबीसीचं १२ टक्के आरक्षण आहे ते देखील रद्द करून टाकलं आहे. यांचे मनमानी निर्णय मराठा समाजासाठी धक्कादायक आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
यांनी मराठा समाजाला असंच गृहीत धरलं आहे की, भांडून भांडून हे आणखी किती भांडणार आहेत. मी राज्य सरकारच्या या निर्णयाचा निषेध करतो आणि याबाबत चिंता व्यक्त करतो की, एसईबीसीमध्ये १२ टक्के शिक्षणाचं आरक्षण रद्द केल्याने मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होईल, असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
भाजप मराठा आरक्षणासाठी समाजाचे नेतृत्व करण्यास देखील तयार असल्याचे, पाटील यावेळी म्हणाले.