भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्सेनिक अल्बमच्या दोन रुपयांच्या गोळ्या २३ रुपयांना खरेदी केल्या जात असल्याबद्दल सरकारवर टीका केली होती. यावर आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ चंद्रकांत पाटील यांना पत्र पाठवत प्रत्युत्तर दिले आहे.
अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या दोन रुपयांना मिळवून द्या; सर्व जिल्हा परिषदांना तुमच्याकडून गोळ्या घेतो,’ असे पत्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाठवले आहे. सोबतच सरकारची बदनामी झाली असून याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी असे त्यांनी म्हटले आहे.
मुश्रीफ यांनी पत्रात म्हटले की, कोरोना रोखण्यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने ‘अर्सेनिक अल्बम – 30 हे होमिओपॅथी औषध वापरण्याची शिफारस केली आहे. राज्यात एकूण 27,877 ग्रामपंचायत असून 44,137 गावे आहेत. त्यानुसार राज्यातील पाच कोटी ग्रामीण जनतेसाठी होमिओपॅथी औषध ‘अर्सेनिक अल्बम -३०’ मोफत देण्याची घोषणा केली. मात्र आपण चुकीच्या माहितीच्या आधारे जनतेची दिशाभूल करीत आहात.