पुणे : राज्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये देखील विविध मुद्यांवरून जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. ऑक्सिजन, लस, रेमडेसिव्हिरच्या पुरवठ्यावरुन केंद्र सरकर विरुद्ध राज्य सरकार अशी स्थिती निर्माण झाली आहे. यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत ‘ऑक्सिजन, लस, रेमडेसिवीर केंद्राने द्यावं, मग तुम्ही काय झोपा काढणार ?’, असा खोचक सवाल करत टीका केली आहे.
प्रत्येक विषयात जर केंद्र करणार असेल, लसीच्या बाबतीत जर आपण केंद्रावर अवलंबून असू पण केंद्राने आता तुम्हाला मोकळीक दिली आहे तुम्ही महाराष्ट्रात निर्मिती करु शकतात, इतर राज्यांतून, देशातून आणू शकतात, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
ऑक्सिजन प्लान्ट सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणी रोखलं होतं का? ज्योतिषी जस म्हणतो की मी आधी म्हटलो होतो तसं आता तुम्ही म्हणताय की मी सहा महिन्यांपूर्वी म्हटलं होतं. मग काय केलं तुम्ही? चपात्या भाजल्या का? ऑक्सिजन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना बोलावून ऑक्सिजनची क्षमता वाढवण्यासाठी सांगितलं का नाही?, असे सवाल चंद्रकांत पाटलांनी केला.
तुमच्या राज्यात रेमडेसिव्हिर निर्मिती करण्याच्या कंपन्या तुम्ही त्यांना सहकार्य करुन क्षमता वाढवू शकतात. ऑक्सिजन तर 100 टक्के निर्मिती करु शकतात. पुणे मनपाकडून सोमवारपासून ऑक्सिजन निर्मिती सुरू होणार आहे. महिन्याभरात जेवढे रुग्णालय आहेत त्यांना इतरांकडून ऑक्सिजन घेण्याची गरज पडणार नाही. जर पुणे महानगरपालिका करु शकते तर सरकार काय झोपा काढत होते का?, अशी जोरदार टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली.