इन्कमटॅक्स, ईडीची कारवाई करुन मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केल्याचा आरोप, राज्याचे ग्रामिवकास मंत्री व जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ यांनी केला आहे. तसेच माझ्यावर जिल्हा बॅंक, राज्य बॅंकेवर कलम 88 ची कारवाई करत मला सहकारातून उठवण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे देखील मुश्रीफ पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
पाटील यांनी आपल्यावर केलेले चुकीचे आरोप मान्य करावेत अन्यथा त्यांच्यावर बदनामाची फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
नेमकं काय म्हणाले मुश्रीफ यावेळी
भाजप सत्तेच्या काळात चंद्रकांतदादांनी खूप त्रास दिला.
सहकार आणि राजकारणातून उठवण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला.
जिल्हा बॅंकेची कलम 88 ची चौकशी लावून या प्रकरणात मला गोवण्याचा प्रयत्न केला.
प्रादेशिक साखर संचालकांवर त्यांनी यासाठी दबावही आणला.
विरोधक म्हणून आयुष्यातून उठवण्यासाठी पुर्वलक्ष्यी प्रभावाने अध्यादेश आणून कायदा करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ईडी, इन्कमॅटक्सच्या माध्यमातून कारवाई केली.
आमच्या ग्रामिवकास विभागाने अर्सेनिक अल्बम हे औषध राज्यातील 5 कोटी जनतेला देण्याचा निर्णय घेतला.
यामध्यही भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला.
वास्तविक औषध खरेदीचा अधिकार हा जिल्ह्याला देण्यात आला आहे, असे असताना चुकीचे आरोप करण्यात आले आहेत.
चंद्रकांतदादा यांनी ‘झालेल्या गोष्टी चुकून झाल्या, गैरसमजातून झाल्या, राजकीय हेतून झाल्या, माहिती न घेता बोलल्याने झाल्या’ हे एकदा कबूल करावे. याबाबत त्यांनी पुन्हा एकदा फेरविचार करावा. त्यातूनही जर त्यांनी या चुका मान्य केल्या नाहीतर आपणाला बदनामीचा फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशारा मुश्रीफ यांनी यावेळी दिला.
सत्तेचा वापर करून शत्रूचेही भले करण्याचा माझा प्रयत्न असतो. लोक वैचारिक विरोधक असतात, ते आपले शत्रू असत नाहीत. पाटील यांनी निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये कंपन्यांचे संचालक असल्याचे लपवल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी खटला करावा. अशा आशयाच्या बातम्या आल्या आहेत. त्याबद्दल मला कोणतेही देणे घेणे नाही. असे व्यक्तिगत जीवनामध्ये किंवा त्यांच्या वाळल्या पालापाचोळ्यावरसुद्धा मी पाय ठेवत नाही. ही माझी संस्कृती आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.