मुंबई : वाढीव वीजबिल माफीवरून विरोधी पक्षाने सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. यावरून आता माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
” बिलमाफीचं क्रेडिट शिवसेनेनं घ्यायचं की राष्ट्रवादीनं, यात नितीन राऊतांचा बळी गेलाय, असं म्हणत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे.
माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलताना म्हणाले की, ‘राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री या तिघांनी एकत्र चर्चा करुन वाढीव वीज बिल माफिबाबत घोषणा करायला हवी होती. जोपर्यंत महाराष्ट्र सरकार वीज बिल कंपन्यांना वीज बिल माफी करण्याएवढे पैसे देत नाही, तोपर्यंत वीज बिल माफी होऊ शकणार नाही. वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर हा पेच जो वाढलेला आहे. तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची संमती न घेतल्यामुळे निर्माण झालेला आहे.’ पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘आताही वेळ गेलेली नाहीये, जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी 5000 कोटी ऊर्जाखात्याला दिले, तर वीज बिल माफी केली जाऊ शकते.’