मुंबई :
राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मुंबई-पुण्याच्या बाहेर कधी निघत नाहीत. हे कधी गेले का दिल्लीला? भेटले का कुणाला?. हे नागपूरला यायला घाबरतात, मग दिल्लीला काय जाणार?, असे प्रश्न करीत माजी ऊर्जामंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
महाआघाडीने महावितरणची थकबाकी कशी वाढली, याच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. ती त्यांनी ताबडतोब करावी आणि अहवाल सादर करावा, असे सांगून बावनकुळे यांनी सरकारला खुले आव्हान दिले. वीज माफीसाठी पाच हजार कोटी रुपयांच्यावर खर्च येणार नाही. आमच्या काळात थकबाकी वाढली होतीच. ती आम्हाला मान्य आहे. मात्र अकरा महिन्यांत कोणालाच काही सवलती न देता ती ६९ हजार १५९ कोटींवर कशी गेली, हेसुद्धा सरकारने सांगावे. जनतेची दिशाभूल करू नये, असे बावनकुळे म्हणाले.
आम्ही घराच्या बाहेर निघणार नाही आणि केंद्र सरकारवर आरोप करता, हे योग्य नाही. जनतेच्या रोजनिशीच्या प्रश्नांवरही जर सरकार संवेदनशील होत नसेल, तर अशा सरकारचा काय उपयोग, असा प्रश्न बावनकुळेंनी केला. आम्ही जनतेला लुबाडले नाही, शेतकऱ्यांना दिलासा दिला म्हणून महावितरणची थकबाकी वाढली. ती चूक असेल तर ती आम्हाला मान्य आहे. मात्र भाजपच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात ऊर्जा खात्यांतर्गत येणाऱ्या फायद्यात असलेल्या तीनही कंपन्या अकरा महिन्यांच्या काळात कशा काय तोट्यात आल्या, याचेही उत्तर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली.