नागपूर : भाजपचे महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावरुन केलेल्या टीकेला उत्तर दिलंय. “छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहे, मात्र मला दुःखानं सांगावं लागत की या वयात त्यांना खोटं बोलावं लागतं. २०१८ ला जेव्हा ही केस सुरू झाली तेव्हा ते जेलमध्ये होते. या संपूर्ण केसची जबाबदारी फडणवीस यांनी मला दिली होती. मी रात्र रात्र बसून या अध्यादेशावर काम केलं आणि अध्यादेश तयार केला. त्यामुळे त्यांच्या या बोलण्यावर किंव येते की असं त्यांना का बोलावं लागलं,” असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “महाविकासआघाडीचं सरकार आलं तेव्हा आम्ही भुजबळ, वडेट्टीवार, नाना पटोले यांना भेटलो. त्यांना अध्यादेश लॅप्स होत आहे असं सांगितलं. त्यांनी तो कन्टिन्यू केला नाही. हे त्यांच्या अंगावर येत आहे. म्हणून ते आता असं बोलत फिरत आहेत. त्यांनी या वयात तरी खोटं बोलू नये. ते खोटं बोलत आहे आणि रेटून खोटं बोलत आहेत. ओबीसी आंदोलनात राजकारण आम्हाला करायचं नाही. चिंतन बैठक आहे असं सांगितलं, मात्र आता ती राजकीय बैठक ठरत आहे. मात्र मी त्यात जाणार आहे.”
छगन भूजबळ नेमकं काय म्हणाले होते?
ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावं म्हणून राज्य सरकार आणि ओबीसी संघटना लवकरच सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत, असं भुजबळांनी नमूद केलं. केंद्र सरकारकडे ओबीसींच्या इंम्पेरीकल डाटाची मागणी आम्ही करतोय. भाजपचं आजचं आंदोलन राजकारणापोटी आहे. त्यांना दाखवायचं आहे की आम्ही ओबीसींसोबत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्त्व करावं आणि केंद्र सरकारकडे जाऊन इम्पेरिकल डाटा मागावा” असं भुजबळ म्हणाले.