मुंबई : विधानपरिषदेतील 12 राज्यपालनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी योग्य निर्णय घेतील. ते समजुतदार आहेत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले. राज्य सरकारने राज्यपालांकडे आमदारकीसाठी पाठवलेली सर्व नावे योग्य आहेत. सर्व निकषांचे पालन करूनच ही नावे निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे आता राज्यपाल यावर निर्णय घेतील, अशी आशा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. ते शनिवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांपूर्वीच विधानपरिषेसाठीच्या 12 सदस्यांची नावे राज्यपालांकडे पाठवली होती. मात्र, राज्यपालांकडून अद्याप यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यपाल या 12 सदस्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेणार का, अशी शंका उपस्थित झाली आहे. तसे झाल्यास महाविकासआघाडी सरकार न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.
तत्पूर्वी सरकारने निश्चित केलेल्या राज्यपालनियुक्त 12 सदस्यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कला किंवा सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या नियुक्तीचे निकष असताना राजकीय नेत्यांची वर्णी लावल्याने दोघा सामाजिक कार्यकर्त्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.