मुंबई : कोविडमुळे सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करावा लागत असला तरी पुढे करोना संकटावर मात करून महाराष्ट्र दिन आपण सुवर्णदिन म्हणून उत्साहात साजरा करू, असा विश्वास व्यक्त करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जीवाचे बलिदान देणाऱ्या सर्व शहीदांना मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले. तसेच, कोरोनाच्या संकटावर देखील आपण मात करू, असा विश्वास त्यांनी जनतेशी संवाद साधताना व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या जनतेला शुभेच्छा देत महाराष्ट्रातील जनता एकजूट, निर्धाराच्या बळावर कोरोनाच्या संकटावर मात करेल असा विश्वास व्यक्त केला.
महाराष्ट्राचा इतिहास संघर्षाचा आहे. महाराष्ट्राला सहजासहजी काहीही मिळालेलं नाही. महाराष्ट्रानं प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष केला आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापनाही संघर्षातून, हुतात्म्यांच्या बलिदानातून झाली आहे. सीमाभागातील मराठी गावांना महाराष्ट्रात आणण्यासाठी तसेच कोरोनाच्या महाभीषण संकटावर विजय मिळवण्यासाठी महाराष्ट्राचा संघर्ष आजही सुरु आहे. महाराष्ट्रातील जनतेची एकजूट, निर्धाराच्या बळावर महाराष्ट्र ही दोन्ही उद्दिष्टे साध्य करील, अशा शब्दात अजित पवारांनी महाराष्ट्र दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.