मुंबई – राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अहमदाबादच्या नावावरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला आज चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मुद्दा राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नामांतराच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांना सवाल केला होता. मिटकरींच्या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी पलटवार केला आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले,”देशामध्ये परकीय आक्रमणाची जी खाणाखुणा असलेली नावं आहेत. ती बदला. अहमदाबादचं नाव बदला, उस्मानाबादचं पण बदला, माझी काहीच अडचण नाही, पण औरंगाबादचं नाव बदलायचं नाही असं तुम्ही ठरवत असाल, तर तुमचं औरंगजेबावर प्रेम आहे? संभाजी महाराजांवर नाही. संभाजी महाराजांबद्दल अॅलर्जी असेल, तर दुसरं नाव सांगा. औरंगजेबाचं नावं औरंगाबादला ठेवा कशासाठी?”, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
“अहमदाबादचं कर्णावती करायला माझी काहीच हरकत नाहीये. परंतु जिथे तुमची सत्ता आहे तिथली नाव आधी बदला ना… यांच्याकडे औरंगाबादचं संभाजीनगर करायची इच्छाशक्ती नाही. महाविकास आघाडीला केवळ महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकारण करायचं आहे,” अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.