कोल्हापूर जिल्ह्यात गेल्यावर्षी प्रलयंकारी महापुराने थैमान घातले होते. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांतील पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांकडे याबाबत चौकशी केली.
पूरस्थितीत कुठेही कमी पडू नका. काही लागले तर सांगा, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे कोल्हापूरच्या पूरस्थितीबाबत चर्चा केली. त्यावर जिल्हा प्रशासनासह सर्व यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी कोल्हापूरच्या पूरस्थितीबद्दल चौकशी केली. कोठेही कमी पडू नका; काही लागले तर सांगा, मदतीबद्दल विचारणा केली. गेल्यावर्षीच्या महापुराच्या अनुभवामुळे यंदा तयारी केली आहे. मात्र, यंदा कोरोना आणि पूर अशा दोन्ही संकटांना दुर्दैवाने तोंड द्यावे लागणार आहे. कोल्हापूरकरांच्या पाठीशी राज्य शासन ठाम असल्याची ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना दिली.