फान पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची आणि पार्किंगमधील गाड्यांची पडझड झाली. मुंबईतील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
‘कालपासून जोरदार पाऊस कोसळत असून आजही पावसाने मुंबईला झोडपले. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील असे भारतीय हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे,’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज (5 ऑगस्ट) मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या.
‘मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना महापालिका, पोलीस, रेल्वे, आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळावी. त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होते आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाही ठिकठिकाणी सुरू असलेलेल्या मेट्रो कामांच्या ठिकाणी अधिक सजग राहून कुठलीही दुर्घटना होणार नाही हे पाहण्यास सांगितले आहे.