राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. संपूर्ण राज्य कोरोनाच्या विळख्यात अडकला असतानाच दुसरीकडे राजकिय घडामोडी देखील वाढत आहे महाविकासआघाडीत अंतर्गत राजकीय वादाला तोंड फुटण्याची श्यक्यता आहे. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्या आहेत.
राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी २ जुलै रोजी मुंबईतील १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर तीनच दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी या सर्व बदल्या रद्द केल्या. या बदल्या करताना मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करण्यात आली नव्हती अशी माहिती आहे. यातून उद्धव ठाकरेंनी आपली पॉवर दाखवत राष्ट्रवादीला ठाकरी हिसका दाखवला. त्यामुळे महाविकासआघाडीतच फूट पडणार की काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १० ज्येष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. बदल्या झालेल्या जवळपास सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या बदलीच्या ठिकाणी पदभार स्वीकारून कामही सुरू केलं होतं. मात्र अवघ्या ४ दिवसात या सर्व पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या. यामुळे सरकारमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आलाय.
दरम्यान, गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा न करता या बदल्या केल्या होत्या का? गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा विश्वास नाही, त्यामुळे त्यांनी बदल्या रद्द केल्या का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ‘ठाकरी’ हिसका दाखवल्याची चर्चा होत आहे. तसेच गृहमंत्र्यांनी केलेल्या या बदल्यांमध्ये परमजित दहिया, प्रशांत कदम, गणेश शिंदे, डॉ. रश्मी करंदीकर, शहाजी उमप, डॉ. मोहन दहिकर, विशाल ठाकूर, संग्रामसिंह निशाणदार, प्रणय अशोक आणि नंदकुमार ठाकूर या अधिकाऱ्यांचा समावेश होता.