नवी दिल्ली : शिवराज सिंग चौहान यांनी कमलनाथ यांनी सत्तेत असलेल्या १५ महिन्यात मध्यप्रदेशसाठी काय केलं? असा प्रश्न विचारला. ज्याला प्रत्युत्तर देताना माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी टीकेची तोफ डागली आहे. माझ्याकडे १५ महिन्यांचा हिशोब मागणाऱ्या भाजपाने आधी १५ वर्षांचा हिशोब द्यावा असं त्यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर आमचं काँग्रेसच व्होट सरकार होतं नोट सरकार नाही असा टोलाही त्यांनी लगावला.
माझ्याकडे १५ महिन्यांच्या हिशोब मागणाऱ्या भाजपाने आणि शिवराज सिंग चौहान यांनी आधी मागच्या १५ वर्षांचा हिशोब द्यावा. २०१८ मध्येही मी हाच प्रश्न उपस्थित केला होता. त्याचं उत्तर ना भाजपाला देता आलं ना शिवराज सिंग चौहान यांना मग जनतेने त्यांना नाकारलं आणि आम्हाला निवडलं. आमचं व्होट सरकार होतं नोट सरकार नाही असा टोला मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी लगावला आहे
मध्यप्रदेशात फेब्रुवारी महिन्यात काही नाट्यमय घडामोडी घडल्या. कारण त्यावेळी काँग्रेसमध्ये असणारे ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपात आले. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आलं. ज्यानंतर शिवराज सिंग चौहान यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून आजवर आपला देश करोनाशी लढतो आहे. असं असलं तरीही राजकारण काही संपलेलं नाही. आरोप आणि प्रत्यारोप यांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवराज सिंग चौहान यांनी कमलनाथ यांनी सत्तेत असलेल्या १५ महिन्यात मध्यप्रदेशसाठी काय केलं? असा प्रश्न विचारला.