ठाणे : मागील काही दिवसांपूर्वी ठाण्यात एका बॅनरवर फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो लावण्यात आले होते. या बॅनरवर काँग्रेसमधील एकाही नेत्याचा फोटो नव्हता त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते आणि स्थानिक नेते नाराज होते. अखेर ठाण्यातील स्थानिक काँग्रेस नेतृत्वानं बॅनरबाजी करत शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकप्रकारे प्रश्नच विचाराला आहे. स्थानिक काँग्रेस नेत्यानं लावलेल्या बॅनरवरुन नाराजी स्पष्ट दिसून येत आहे. सरकार तिघांचं आणि नाव दोघांचंच, अशा शब्दांत काँग्रेसने आघाडी सरकारवर टीका केली आहे. ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी हा बॅनर लावलेला आहे.
नुकत्याच मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत MMR क्षेत्रात असलेल्या ८ महानगरपालिका आणि ७ नगरपालिका स्वतंत्र SRA प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करणारा एक बॅनर स्लम डेव्हलपर्स आणि आर्किटेक्ट असोसिएशनने तीन हात नाक्यावर लावला आहे.त्यामध्ये काँग्रेस नेत्यांच्या फोटोला दुय्यम स्थान देण्यात आल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत बॅनर बाजी केल्याचे दिसून आले.
या बॅनरवर नाराजी दाखवून काँग्रेसनेही या बाजूलाच तेवढाच मोठा बॅनर लावून सरकार तिघांचं, मग नाव का फक्त दोघांचं ?, असा सवाल केला आहे. या बॅनर्सवर काँग्रेसने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा भला मोठा फोटो लावून हा सवाल केला आहे. “सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला नसता तर जनकल्याण करणारे ठाकरे सरकार, महाराष्ट्रात सत्तेवर आले असते का ?” असा थेट प्रश्न विचाला आहे.