मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अद्याप जवळपास दीड वर्षाचा कालावधी आहे. मात्र पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपने मुंबई महापालिकेत स्वबळावर भाजपाचा महापौर आणू, असा नारा दिला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी देखील तयारीला लागली आहे.
मात्र सध्या राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र सत्तेत असले तरी, मुंबई महापालिका निवडणूक हे पक्ष सोबत लढणार का याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसने निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे.
महाविकास आघाडीशी चर्चा निष्फळ ठरली तर काँग्रेस सर्व 227 जागांवर लढेल, असे वक्तव्य मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी केले आहे. हायकमांडने आदेश दिले तर 227 जागांची काँग्रेसची तयारी असल्याचे म्हणत, त्यांनी एकप्रकारे स्वबळाचा नारा देखील दिला आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्वबळावर महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्याची घोषणा केली.