पुणे : काँग्रेस पक्षाचे राज्यसभा राज्यसभा राजीव सातव यांना १९ एप्रिलला करोनाची लक्षणे दिसून आली. त्यानंतर त्यांनी २१ एप्रिलला तपासणी केल्यावर, त्यांना २२ एप्रिलला करोना झाल्याचे स्पष्ट झाले. यावर उपचार घेण्यासाठी ते पुण्यातील जहांगीर रूग्णालयात २३ एप्रिलला दाखल झाले.
मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने, त्यांना तातडीने आयसीयूमध्ये उपचारांसाठी दाखल केले गेले. तेथून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेमडेसिवीर आणि अन्य इंजेक्शन देण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, त्याच दरम्यान त्यांची प्रकृती अजून बिघडल्याने कालपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे
दरम्यान, काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी राजीव सातव यांच्या प्रकृतीविषयी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. “राजीव सातव यांच्यावर उपचार सुरू असून, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे”, अशी माहिती विश्वजीत कदम यांनी दिली आहे.
दुसरीकडे, त्यांच्या प्रकृतीविषयी सकाळपासूनच चिंता व्यक्त केली जात होती. त्यामुळे काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी देखील रुग्णालयातील डॉक्टरांशी फोनवर चर्चा करून सातव यांच्यावरील उपचारांची माहिती घेतली.
तसेच, काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यातील काँग्रेस पक्षाचे नेते यांनी देखील सतत फोनच्या माध्यमातून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.
“काल दुपारपर्यंत त्यांची प्रकृती पाहून आम्ही चर्चा केली. पण पुन्हा डॉक्टर, कुटुंबीय आणि इतरांचा सल्ला घेतला गेला. तेव्हा राजीव सातव यांची प्रकृती स्थिर झाल्यावर जर गरज पडली तर मुंबईला दाखल करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे सांगत कदम यांनी, राजीव सातव हे उपचारांना प्रतिसाद देत असून ते लवकरच करोनावर मात करतील असे सांगितले आहे.