अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत असताना या प्रकरणात बिहारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या तपासाविषयी आरोप केले. त्यानंतर सुशांत सिंह प्रकरणावरून वारंवार शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून करण्यात आले. पोलीस दबावाखाली काम करत असल्याचा आरोप भाजपात गेलेले नारायण राणे यांनी देखील केला. मात्र आता महाराष्ट्र भाजपाकडून झालेल्या टीकेला काँग्रेसनं उत्तर दिलं आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून भाजपावर निशाणा साधला. “बिहार निवडणूकीसाठी राजकारण करण्याकरिता बिहार पोलिसांचे गुणगान करुन मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र भाजपाच्या नेत्यांचा महाराष्ट्र द्रोह हा उठून दिसत आहे. ही मंडळी अत्यंत खालच्या पातळीवर उतरू शकतात. भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे,” असा हल्लाबोल सावंत यांनी केला.
बिहार निवडणूकीसाठी राजकारण करण्याकरिता बिहार पोलिसांचे गुणगान करुन @MumbaiPolice ला बदनाम करण्याच प्रयत्न करणाऱ्या @BJP4Maharashtra च्या नेत्यांचा महाराष्ट्र द्रोह हा उठून दिसत आहे. ही मंडळी अत्यंत खालच्या पातळीवर उतरू शकतात. भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 7, 2020
बिहारमधील राजकीय नेत्यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित केली होती. त्यापाठोपाठ महाराष्ट्र भाजपाच्या नेत्यांनीही मुंबई पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर आता काँग्रेसने पुढे येत भाजपवर हल्लाबोल केला आहे.