मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचे आधीच जाहिर केले आहे. त्याच सुरात सुरु मिळवत भाई जगताप यांनी मिळवला होता. आता पुन्हा एकदा स्वबळावर शिवसेनेला काँग्रेसने चांगलाच चिमटा काढला आहे.
जर काँग्रेस स्वबळावर लढण्याची इच्छा बाळगत असेल तर शिवसेनेला मिरच्या का झोंबतात?, अशा शब्दात काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गेल्या काही दिवसांपासून सतत स्वबळाचा सूर लावला आहे. काँग्रेस इथून समोरील निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची वक्तव्ये ते वारंवार करत आहेत. त्यांना काही काँग्रेस नेते साथ देत आहेत, तर काही नेते मात्र स्वबळाच्या नाऱ्यामुळे नाराज आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. सरकारमध्ये काँग्रेसचे जवळपास डझनभर मंत्री असूनही स्वबळाची भाषा कशाला, अशी भावना राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आहे. काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची माहिती आहे. या सगळ्या प्रकरणावर बोलताना निरुपम यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एकला चलो रे या घोषणेवर मी सहमत आहे. कॉँग्रेसला संपवण्यासाठी किंवा सतत तिसऱ्या क्रमांकावर ठेवण्यासाठी जाणूनबुजून प्रयत्न केला जातो. पण मला वाटतं काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे. जर काँग्रेस स्वबळावर लढत असेल, तशी इच्छा असेल तर शिवसेनेला, किंवा त्यांच्या प्रक्षप्रमुखांना मिरची झोंबायचे कारण नाही, असं निरुपम म्हणाले.
पटोले दौरा अर्धवट सोडून दिल्लीला रवाना, स्वबळाच्या भाषेवर मंथन?
नाना पटोले नियोजित उत्तर महाराष्ट्र दौरा सोडून दिल्लीला रवाना होत आहेत. नाना पटोले यांनी केलेली स्वबळाची भाषा, महाविकास आघाडीतील कुरबुरी या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात नाना पटोले हे पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.