मुंबई : राज्यातल्या वाढत्या महामारीच्या प्रादुर्भावामुळे, राज्य सरकारने १४ एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानंतर, सातत्याने यामध्ये आणखीन निर्बंधांची वाढ करून, २२ एप्रिलपासून जिल्ह्यांतर्गत आणि राज्याबाहेरील प्रवासावरही बंदी घालण्यात आली.
तसेच, लोकल आणि बससेवाही सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे. आता १ मेपर्यंत ही नवीन नियमावली लागू राहणार आहे. परंतु, १ मे नंतरही राज्यात लॉकडाऊन वाढणार का, असा सवाल आता सामान्य नागरिकांकडून सरकारला विचारला जात आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी, राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता वर्तवली आहे. उद्या बुधवारी कॅबिनेटची बैठक होणार आहे. त्यामध्ये, राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असे वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
दरम्यान, राज्यातील महामारीची परिस्थिती गंभीर बनली असून ऑक्सिजन, बेड, रेमेडिसीवीर इंजेक्शन, लसींचा मोठा तुटवडा जाणवत आहे. परिणामी वैद्यकीय यंत्रणेवर भारी ताण पडला असून, अनेक ठिकाणी महामारीशी लढण्यासाठी नर्सिंग स्टाफ मिळत नाहीये. त्यामुळे राज्यात १ मे नंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.