नवी दिल्ली : भारतासह संपुर्ण जग कोरोना लसीची वाट पाहत आहे. काही देशांमध्ये लसीकरण सुरू झाले आहे. भारतात देखील अनेक लसी शेवटच्या टप्प्यात आहे. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठं वक्तव्य केले आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीसाठी देशाला आता जास्त काळ वाट पाहण्याची आवश्यकता नाही, असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. ते आग्रा मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, मागच्या काही दिवसांपासून सर्वांचेच लक्ष लसीकडे लागले आहे. मी शास्त्रज्ञांची भेट घेतली आहे. लसीसाठी देशाला आता जास्त काळ थांबण्याची आवश्यकता नाही.
संसर्ग रोखण्यासाठी आपल्याबाजूने दुर्लक्ष करुन चालणार नाही. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग आवश्यक आहे, असे आवाहन देखील त्यांनी केले. याआधी काही दिवसांपुर्वीच मोदींनी ‘भारतात सुरू असलेलं संशोधन आता काही आठवड्यांत पूर्ण होईल आणि त्यानंतर लगेच संशोधकांनी हिरवा कंदील दाखवल्यावर लसीचे वितरण सुरू होईल’, अशी माहिती दिली होती.