भोपाळ: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे गाईचे शेण व गोमुत्रावर एक वक्तव्य समोर आलं आहे. गाईचे शेण व गाईच्या गोमूत्रामुळे राज्य तसेच देशाची अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते, असं त्यांनी म्हटलं आहे. शेण आणि गोमुत्राकडे आता आपण देशवासीयांनी आर्थिक दृष्टीकोनातून पाहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. इंडियन वेटनरी असोसिएशनच्या महिला विभागाच्या संमेलनात मुख्यमंत्री बोलत होते. चौहान यांचा या वक्तव्याविषयीचा व्हिडीओ सध्या कमालीचा व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी गाय, बैलाच्या शेणाचे आणि गोमुत्राचे महत्व सांगितले आहे. गाय आणि बैलाशिवाय काम होऊ शकत नाही. सरकारने अभयारण्य आणि गोशाळा बनवल्या आहे. पण त्याच्याशी समाज जोडला गेल्याशिवाय केवळ गोशाळा उघडून काम होणार नाही, असे चौहान म्हणाले.
मध्य प्रदेशात लोकांमध्ये याविषयी जागृती करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगून चौहान म्हणाले आहेत. गायीच्या शेण आणि गोमूत्र यामुळे अर्थव्यवस्था मजबूत करू शकतो. देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवू शकतो. मध्य प्रदेशात स्मशान भूमीत लाकडं जाळली जाऊ नयेत, यासाठी आमचा प्रयत्न आहे.
स्मशानभूमीमध्ये शेणापासून बनवलेल्या गवऱ्यांचा वापर करण्याचा प्रयत्न आहे, असेही चौहान यांनी सांगितले. याच कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पुरूषोत्तम रुपाला हेही उपस्थित होते. ते म्हणाले, गुजरातमधील ग्रामीण भागातील अनेक महिला गोपालनाशी जोडल्या गेल्या आहेत आणि गायीची सेवा देखील करतात. त्यामुळे तेथील दुधव्यवसायात मोठे यश मिळाले आहे. मध्य प्रदेशामध्ये हिंदुत्वासंबंधी अनेक गोष्टींना सरकारी पातळीवरून समर्थन मिळत असल्याचे नेहमीच दिसत आहे. याचाच प्रत्यय मुख्यमंत्र्यांच्या एका वक्तव्यातून येत आहे. मागील वर्षी राज्यामध्ये भाजप सरकारने ६ विभागांच्या मंत्र्यांबरोबर एका गौ कॅबिनेटच्या स्थापनेची देखील घोषणा करण्यात आली होती.