मुंबई: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस कडून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला जात आहे. यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रतिक्रिया दिली होती. यावर आता विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, की भाजपही स्वबळावर निवडणूक लढवू शकतं.
पुढे राज्यातील महाविकासआघाडी सरकारला टोला लगावत ते म्हणाले, की हे महाविकासआघाडीला ठरवायचं आहे, की ते कोणासोबत युती करतील? एकमेकांवर चपला फेकतील की पुष्पहार अपर्ण करतील, हे तेच ठरवतील, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
BJP will contest polls on its own. It is for them (Maha Vikas Aghadi) to decide on who they will form an alliance with, throw a slipper at or present a garland to: BJP's Devendra Fadnavis on Maharashtra CM Uddhav Thackeray's reported statement about Congress fighting alone pic.twitter.com/aT5B6tNsFj
— ANI (@ANI) June 20, 2021
स्वबळावर निवडणुका लढण्याचे नारे काँग्रेस गेल्या काही दिवसांपासूव देत आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तसं जाहीर वक्तव्य सुद्धा केलं आहे. त्यामुळेच, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाला सणसणीत टोला लगावला आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना ऑनलाईन माध्यमातून संबोधित केलं होतं. यावेळी उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेस पक्षाला टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या संबोधनात म्हटलं, अनेक पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत. स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यासाठी असू नये. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं. आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ, स्वबळावर लढणं हा आमचा हक्क आहे.
गोंधळातून बाहेर या
महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करीत आहेत. हा त्यांचा प्रश्न आहे, पण त्या पक्षातदेखील एक नेता म्हणतो आम्ही स्वबळावर लढणार, दुसरा नेता म्हणतो आमची भूमिका नाही. त्यामुळे आधी त्या सगळ्यांनी गोंधळातून बाहेर यावे आणि नंतर स्वबळ वगैरे काय आहे त्यावर निर्णय घ्यावा, असा सल्ला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.