मुंबई : राज्यात महामारीच्या दिवसेंदिवस होणाऱ्या रुग्णवाढीमुळे बेड्स, ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर्स, रेमेडीसीवर इंजेक्शन्स आणि लसींची उपलब्धता अपुरी आहे. यामुळे रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होतानाचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे यावरून राज्य सरकार आणि विरोधक यांच्यातले राजकारण शिगेला पोहोचले आहे.
यातच शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना, १ मे रोजी महाराष्ट्र दिनापासून लसीकरण सुरु करण्याची तयारी आपण केली आहे. याबाबत १ मे च्या दिवशी मुख्यमंत्री मोफत लसीबाबत राज्याची भूमिका सांगतील, असं सांगितलं होतं. मात्र नंतर यावरून सत्ताधारी पक्षांमध्ये श्रेयवादाचे राजकारण होताना आपल्याला पाहायला मिळाले.
दरम्यान, आज पुन्हा महामारीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारनं लसीकरणाला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच मोफत लसीकरणाची घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्या याबद्दलचा निर्णय होऊ शकेल, अशी माहिती पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.
यावेळी, उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक आहे, त्यात मोफत लसीकरणाचा निर्णय होऊ शकतो. १८ वर्षांवरील व्यक्तींचं मोफत लसीकरण करण्याबद्दलच्या प्रस्तावावर मी स्वाक्षरी केली आहे, असे सांगताना, तुम्ही २४ तास थांबा. तुम्हाला माहिती मिळेल. नाही तर उद्या तुम्हीच म्हणाल, अजितदादा एक बोलले होते आणि कॅबिनेटनं दुसराच निर्णय घेतला, असा चिमटा देखील यावेळी त्यांनी पत्रकारांना काढला.