मुंबई : तौक्ते वादळामुळे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे नुकसान झाले आहे. यापार्श्वभूमीवर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. देंवेंद्र फडणवीस कोकण दौऱ्यावर पोहचताच राज्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौऱ्याची घोषणा केली. आज ते कोकण दौरा करत आहेत. यावरून भाजपच्या महिला प्रदेशउपाध्या चित्रा वाघ यांनी बोचरी टीका केली आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. त्या म्हणतात.. “देवेन्द्रजी..काय राव तुम्ही, थेट दुष्काळीभागात लोकांच्या मदतीला पोहोचतां, मग इथे मुख्यमंत्र्यांनाही निघावं लागतं ना, ३ तासाच्या कोकणदौर्यात त्यांनी किती गावांना भेटी दिल्या कितींच सात्वंन केलं हे सगळ कृपा करून विचारू नका, आणि हो पर्यटनफोटोसेशन ३ तासात शक्य नाही म्हणून रद्द केलयं”, अशी बोचरी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
देवेन्द्रजी..काय राव तुम्ही
थेट दुष्काळीभागात लोकांच्या मदतीला पोहोचतां
मग इथे मुख्यमंत्र्यांनाही निघावं लागतं ना३ तासाच्या कोकणदौर्यात त्यांनी किती गावांना भेटी दिल्या कितींच सात्वंन केलं हे सगळ कृपा करून विचारू नका
आणि हो पर्यटनफोटोसेशन ३ तासात शक्य नाही म्हणून रद्द केलयं
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 21, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्याच्या निमित्ताने रत्नागिरीमध्ये पोहचले आहेत. तौते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणाला दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करुन मदत जाहीर केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीत आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “करोना संकट असताना त्यात तौते चक्रीवादळाने भर टाकली आहे. शेवटी वाऱ्याचा वेग आणि पावसाचा जोर यावर नुकसान अवलंबून असतं. दुर्दैवाने काही मृत्यू झाले आहेत. कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवलं जाईल,” असं सांगितलं.
दरम्यान, गेली दोन दिवस झाले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखिल कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अगोदर पाहणी करून आढावा घेतला आहे. त्यामुळे यावरून चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.