मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मुद्यांवरून ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचे काम भाजपने केले आहे. भाजपकडून देखील खासकरून देवेंद्र फडणवीस आक्रमक भूमिका घेत ठाकरे सरकारला घेरण्याचे काम करत आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात देखील फडणवीस सातत्याने सरकारवर निशाणा साधत आहेत. यातच आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी देवेंद्र फडणवीसांच्या कार्यपद्धतीवर भाष्य करत निशाणा साधला आहे.
रिबेरो यांनी ‘ द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये लेख लिहित फडणवीसांच्या कार्यपद्धतीवर भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री होते. मात्र सध्या मुख्यमंत्रिपदासाठी ते उतावीळ झाले असून, त्यांच्याकडून चुकीची पावलं टाकली जात आहेत, असे रिबेरो यांनी म्हटले आहे.
ब्रुक फार्मा कंपनी प्रकरणावरून भाजप आणि ठाकरे सरकार आमनेसामने आले होते. यावर बोलताना रिबेरो लेखात म्हणाले की, ब्रूक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ते गृहमंत्री असताना केलेला नियमच मोडीत काढला. राज्याच्या सुव्यवस्थेचे आणि कायद्याचे प्रतिक असलेल्या पोलीस ठाण्यात जाणे, त्याठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घालणे, अधिकाऱ्यांची चढ्या आवाजात बोलणे या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्या पदाला साजेशा नव्हत्या. फडणवीस यांनी त्यांचा संयम गमावला.
फडणवीसांनी करोनावरील औषधांच्या तुटवड्याचे अशा पद्धतीने राजकारण करणे – पोलीस स्टेशनला जाऊन नको तो प्रमाद करणे माजी मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. त्यांनी त्यासाठी पोलिसांची माफी मागायला हवी. देवेंद्र जे करताहेत, ते महाराष्ट्राच्या हिताचे नाही आणि, त्यांच्या स्वतःच्याही फायद्याचे नाही. द्रुतगती मार्गावरची ही स्वतःची घसरगुंडी देवेंद्र फडणवीसांनी रोखायला हवी, असेही म्हणाले.
सचिन वाझे प्रकरण त्यांनी मुळापासून एक्स्पोज केले, तर मला आनंद होईल. कारण त्यामुळे पोलीस आणि राजकारण्यांचे भ्रष्ट नेक्सस उजेडात येईल, असं रिबेरो यांनी म्हटलं आहे.