राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक, त्यांचे शोषण तातडीने थांबवण्याबाबत. मागील तीन महिन्यांचे वेतन नाही, कामगार कपातीमुळे भविष्याच्या निर्माण झालेल्या समस्या, त्यांच्या जीवनातील अनिश्चितता याकडे लक्ष देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे की, राज्य महामार्ग परिवहन सेवेतील(एसटी) कर्मचाऱ्यांची सध्या परवड सुरू आहे. हे सर्व कर्मचारी त्यांच्या कुटुंबीयांना अनेक आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. तीन ते चार महिन्यांपासून काही महिन्यांचे आंशिक वेतन त्यांना प्राप्त झाले. जूनचे तर वेतनच अद्याप प्राप्त झालेले नाही.
राज्यातील एसटी कर्मचार्यांना तीन महिन्यांपासून वेतनात कपात, कामगार कपातीच्या संकटामुळे सातत्याने डोक्यावर टांगती तलवार, भविष्यासाठीची अनिश्चितता यासारख्या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याबाबत मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांना पत्र @CMOMaharashtra pic.twitter.com/ONrD9oDfsU
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 25, 2020
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे 25 टक्के वेतन अजून मिळालेले नाही, मे महिन्याचे 50 टक्के वेतन अजून मिळालेले नाही, तर जून महिन्याचे 100 टक्के वेतन अजून मिळालेले नाही. त्यामुळे एसटीच्या अनेक कर्मचाऱ्यांवर आपल्या अर्थार्जनासाठी भाजीपाला विकणे, गवंड काम करण्याची वेळ आली आहे. एसटीच्या लाखावर कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय सध्या अतिशय अस्थिर मानसिकतेत जीवन जगत आहेत. एकीकडे वेतन नाही व दुसरीकडे भविष्यात आपल्या नोकऱ्या तरी टिकणार का? ही चिंता त्यांना सतावत आहे. दुष्काळी भागातील ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्यांना आपण 2019 मध्ये एसटीच्या सेवेते सामावून घेतले, त्यातील हजार 500 जणांना घरी बसवण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत त्यांना सेवेवर येऊ नये, असे सांगण्यात आले आहे. याशिवाय 50 वर्षांवरील कर्मचाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्ती देण्याचाही घाट घातला जात आहे. असे करताना कुठल्याही संघटनांना विश्वासात घेतले गेले नाही, हे तर आणखी दुर्देवी असल्याचे फडणवीस म्हणाले.
सटी कर्मचाऱ्यांपैकी 328 कर्मचारी कोरोनाबाधित झाले. त्यापैकी 8 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या 8 जणांच्या कुटुंबीयांना अद्यापही मदत मिळालेली नाही. याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशीही विनंती फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे.