मुंबई: सध्या महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनची सध्याची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. भारतीय जनता पक्षाने या संकट काळात आता जाबदारीने वागावे असे काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटले आहे. नुसतंच राज्य सरकार कसे अडचणीत येईल याचा प्रयत्न करू नये. केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला भक्कम मदत कशी मिळेल यासाठी राज्य सरकार च्या सोबत खांद्याला खांदा लावून प्रयत्न करावेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण बाजूला ठेऊन महाराष्ट्रातील जनतेसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे. राष्ट्रीय आपत्ती असून देखील महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकार कडे भीक मागावी लागत आहे. केंद्र सरकारचे कर्तव्य असताना केंद्र सरकारने आता त्यांची जबाबदारी झटकायला नाही पाहिजे. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या बाबतीत राजकीय दुजा भाव करत आहे. राज्याला ५० ते ६० हजार रेमेडीसीवर इंजेकशन ची गरज असताना महाराष्ट्राला फक्त २६ हजार देण्याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. हा महाराष्ट्रावर केंद्राने केलेला अन्याय आहे हे आता भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आले पाहिजे.
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. महाराष्ट्रात सत्ता नसल्याने केंद्र सरकाने ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीत ,रेमेडीसीवर इंजेकशन्स,आणि लसींच्या पुरवठ्या बाबत राजकारण करू नये. मराठी माणूस खूप आशेने राज्य सरकार आणि केंद्र सरकार कडे पाहत आहे. राज्यातील विरोधी पक्षांनी आणि नेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या जीवाचे मोल लक्षात घेतले पाहिजे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता महाराष्ट्र सरकार सोबत येत महाराष्ट्राचा आवाज बनून केंद्र सरकारकडे राज्याच्या मदतीसाठी भांडले पाहिजे असे पटोले यांनी म्हटले आहे.