मुंबईत वादळी वाऱ्यासह कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरल्यामुळे रस्ते बंद झाले होते. एरवी सर्वसामान्यांना पावसात हाल सहन करावे लागताना आपण अनेकदा पाहिले आहे. मात्र या पावसात महाविकास आघाडीचे मंत्री धनंजय मुंडे यांना देखील सुमारे तीन साडे तीन तास अडकून रहावे लागले.
मी गेली २४-२५ वर्षांपासून मुंबईला येत आहे. पण, काल अनुभवलेली मुंबई, यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. ईस्टन फ्री वे ब्रिजबर एकाच जागेवर गाडी तीन ते साडेतीन तास गाडी उभी होती. मी सकाळी साडे नऊ वाजता परळीवरुन मुंबईकडे निघालो होतो. मुंबईत दाखल झाल्यानंतर पावसामुळे मला एकाच जागेवर थांबावे लागले. यावेळी खूप भूक लागली होती, पोटात कावळे ओरडत होते. ही भूक आईने सकाळी निघताना सोबत दिलेल्या दशम्यांनी भागवली.’ असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
तसेच या अनुभवानंतर नैसर्गिक आपत्ती आल्यावर ना सामान्य माणुस, ना मंत्री, कोणाचेच चालत नाही. हा अनुभव मला काल आला.’ अशी प्रतिक्रीया धनंजय मुंडे यांनी दिली.
पावसामुळे रस्त्यांची होत असलेली दुर्दशा आणि तुंबणारे ड्रेनेज यामुळे सर्वसामान्यांना नेहमीच त्रास होत असतात मंत्र्यांना देखील या त्रासाला सामोरे जावे लागल्याने निदान आता तरी निसर्गामुळे का होईना पण सर्वसामान्यांच्या व्यथा आलिशान गाड्यांतून फिरणाऱ्या मंत्र्यांपर्यंत नक्की पोहचतील आणि त्यावर योग्य उपाय योजना करण्यासाठी ते विचार करतील एवढीच आशा सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आहे.