मुंबईत वादळी वाऱ्यासह कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरल्यामुळे रस्ते बंद झाले होते. या पावसाचा फटका सामान्यांसोबत मंत्र्यांनाही बसल्याचे पाहायला मिळाले.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे काल मुंबईत झालेल्या पावसादरम्यान तीन ते साडे तीन तास एकाच जागेवर अडकून पडले होते. त्यांचा हा पावसाचा अनुभव धनंजय मुंडे यांनी सांगितला आहे. “नैसर्गिक आपत्ती आल्यावर ना सामान्य माणुस, ना मंत्री , कोणाचेच चालत नाही. हा अनुभव मला काल आला.” अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी काल अनुभवलेल्या पावसावर दिली.
‘मी गेली २४-२५ वर्षांपासून मुंबईला येत आहे. पण, काल अनुभवलेली मुंबई, यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. ईस्टन फ्री वे ब्रिजबर एकाच जागेवर गाडी तीन ते साडेतीन तास गाडी उभी होती. मी सकाळी साडे नऊ वाजता परळीवरुन मुंबईकडे निघालो होतो. मुंबईत दाखल झाल्यानंतर पावसामुळे मला एकाच जागेवर थांबावे लागले. यावेळी खूप भूक लागली होती, पोटात कावळे ओरडत होते. ही भूक आईने सकाळी निघताना सोबत दिलेल्या दशम्यांनी भागवली.’ असे धनंजय मुंडे यांनी सांगितले
मुंडे पुढे म्हणाले की, ‘तीन साडे तीन तासानंतरही रस्त्यावरची एकही गाडी पुढे जात नव्हती. अखेर पालिकेच्या आणि पोलिसांच्या मदतीने समोरच्या काही गाड्या बाजुला घेत छातीइतक्या पाण्यातून गाडी चालवत सीएसटी रेल्वेस्टेशनपर्यंत आलो. स्टेशनवर एक-दीड तास थांबलो आणि अधिकाऱ्यांशी कॉर्डिनेट करुन चालत पुढच्या स्टेशनपर्यंत गेली आणि शेवटी रात्री साडे आकरा वाजता नियोजीत ठिकाणी पोहचलो.’
‘मला संध्याकाळी शरद पवारांच्या बैठकीला जायते होते, पण पावसामुळे जाता आले नाही. त्यांना मी फोटो आणि व्हिडिओ पाठवून परिस्थितीची माहिती दिली. याबाबत इतकच सांगले की, नैसर्गिक आपत्ती आल्यावर ना सामान्य माणुस, ना मंत्री मंत्री, कोणाचेच चालत नाही. हा अनुभव मला काल आला.’ अशी प्रतिक्रीया धनंजय मुंडे यांनी दिली.