सोलापूर : माझं कुटुंब, माझी जबाबदारी, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात. पण आता फक्त भावनिक आवाहन करुन चालणार नाही. काम करायला हवं. सरकार चालवण्याचा जर दम नसेल, तुम्ही रडत बसणार तर मग शेतकऱ्याला काय मदत करणार?, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. प्रवीण दरेकर आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीमुळे नुकासान झालेल्या भागांची ते पाहणी करत आहेत. दरम्यान, यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.
या सरकारमध्ये समन्वय नाही. राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी कर्ज काढायला काय हरकत आहे? कर्ज काढायची सरकारची क्षमता आहे. तुम्ही सगळे एकत्र बसा आणि निर्णय घ्या, असं आवाहन प्रवीण दरेकर यांनी केलं.एकीकडे राज्य सरकारला मदत करायला दीड महिना लागेल असे म्हणत आहे, तर दुसरीकडे केंद्र सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी करत आहेत. एकीकडे केंद्राला मदत मागायची आणि मग टीकादेखील करायची ही कोणती पद्धत आहे? हा मूळ प्रश्नापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे”, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.
सत्ताधारी फक्त महाविकास आघाडी टिकवण्यासाठी काम करत आहेत. राजकारण भोवतीच हे फिरतात. डोळ्याने शेती उद्ध्वस्त झालेली दिसते आहे. त्यांनी फोटोच्याआधारे सरसकट मदत करावी”, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
राज्य सरकार केंद्राने मदत करावी म्हणत केंद्राकडे बोट दाखवत आहे. नाचता येई ना आंगन वाकडे, अशी गोष्ट आहे. पण केंद्राकडे बोट दाखवत स्वतःची जबाबदारी टाळता येणार नाही. वाद निर्माण करायचा आणि मूळ प्रश्नापासून लक्ष विचलित करायचं, अशी या सरकारच्या कामाची पद्धत आहे, अशी टीका दरेकरांनी केली.
Read Also :
फडणवीसांना अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटत आहे… https://t.co/Xa3kF0T0wX @Prksh_Ambedkar @Dev_Fadnavis
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 20, 2020