मुंबई: आर्यन खानचे अपहरण व खंडणीचे षडयंत्र भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांनीच रचल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत केला होता. कंबोज हेही वानखेडे यांच्या प्रायव्हेट सपोर्ट आर्मीचा हिस्सा असल्याचा दावा देखील नवाब मलिक यांनी केला होता.
आज सकाळी पुन्हा एकदा आर्यन खान प्रकरणासंबंधी ट्विट करून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली आहे. मालिकांकडून सर्वप्रथम वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र आणि कारवाईसंबंधी आरोप सुरु होते. आता त्यांनी त्यांचा मोर्चा वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडेकरांच्या कुटुंबाकडे वळविला आहे.
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांची मेव्हणी व क्रांती रेडेकरांची बहीण हर्षदा दीनानाथ रेडेकर हिच्याविषयी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी समीर वानखेडे यांनाच एक प्रश्न विचारला आहे. समीर दाऊद वानखेडे तुमची मेव्हणी श्री हर्षदा दीनानाथ रेडकर ही ड्रग्झ व्यवसायात सहभागी आहे का ? पुणे न्यायालयात तिचं एक प्रकरण प्रलंबित असल्यानं तुम्ही याचं उत्तर द्यायलायच हवं असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
मालिकांनी केलेल्या ट्विटमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणाची माहितीही शेअर केली आहे . त्यानुसार या प्रकरणाची पुणे न्यायालयात १४ जानेवारी २००८ रोजी नोंद झाली आहे. या प्रकरणाची पहिली सुनावणी १८ फेब्रुवारी २००८ रोजी झाली होती आणि आता १८ मार्च २०२२ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. माध्यमांशी बोलताना मलिक म्हणाले की पुण्याच्या न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात भाजपचे नेते मोहित कंबोज हेच मास्टरमाईंड असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आर्यनचे अपहरण करून खंडणी वसूल करण्याचा त्यांना प्लॅन होता. त्यासाठी त्यांनी भाचा ऋषभ सचदेवाच्या माध्यमातून ट्रॅप लावला होता. पण एका सेल्फीने त्यांचा खेळ उघडकीस आल्याचा आरोप मलिकांनी केला आहे आणि भाजपचे नेते कंबोज यांनी हे आरोप फेटाळून लावत मलिकांवर टीकास्त्र सोडलं.