अहमदनगर: पावसाळ्यात मुंबई तुंबण्याची विविध कारणे देतानाच अहमदाबाद व चेन्नईमध्ये पाणी तुंबते तेव्हा विरोधक गप्प का बसतात?, असा सवाल करणाऱ्या शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखाला माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले आहे. ‘चेन्नई, अहमदाबादकडे बोट दाखवून मुंबईची जबाबदारी झटकू नका,’ असे विखे पाटील यांनी म्हटले आहे.शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे यांनी शिवसेनेला उत्तर दिले आहे.
ते म्हणाले, ‘मुंबईत गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. या काळात त्यांना मुबंईचे प्रश्न का सोडविता आले नाहीत. दुसरीकडे बोट दाखवून आपले अपयश झाकता येत नसते. मुंबईत पाणी तुंबण्याचे अपयश तुमचेच आहे. अहमदाबाद-चेन्नईत कसे चालते, असा प्रश्व विचारून शिवसेना मुंबईतील जबाबदारी टाळू शकत नाहीत. हे अपयश तुमचेच आहे. हजारो कोटी रुपये खर्च करूनही मुंबई कशी तुंबते? नालेसफाईत अनेकांनी आपले हात साफ करून घेतले आहेत,’ असा आरोपही विखे पाटील यांनी केला. आपण पूर्वी विधानसभेत हा विषय उपस्थित करून चौकशी करण्याची मागणी केली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा
‘राज्यात गेल्या काही काळापासून जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे नियम निकषात अडकून न पडता ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. ते म्हणाले, एखाद्या भागात जर २४ तासांत ६५ मिलीमीटर पाऊस झाला तरच नुकसान भरपाई मिळण्याचा जुना नियम आहे. तो बदलण्याची गरज आहे. अतिवृष्टीमुळे चार दिवसात अनेक भागात शंभर मिलीमीटर पाऊस झाला आहे. काही ठिकाणी ओढे, नाले फुटल्याने शेतात पाणी भरले आहे. त्यामुळे सरकारने जुना निकष बदलून सरसकट पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी,’ अशी मागणीही विखे पाटील यांनी केली.
Read Also;
मराठा समाजावर आंदोलन करण्याची वेळ सरकारने येऊ देऊ नये अन्यथा ….https://t.co/RK5P8mGCER
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 24, 2020