ट्विटरच्या माध्यमातून जे टीका टिपण्णी करत आहेत त्यांनी भान ठेवावे , असा पलटवार शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर केला आहे.
वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता अंतिम वर्षांचा परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत होती यासाठी युवासेनेच्या वतीने आदित्य ठाकरेंनी याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ३० सप्टेंबरच्या आधी परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.
‘एका ‘बबड्याच्या’ हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला…त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला. आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकार…! ऐकतो कोण?असे शेलार म्हणाले होते , यावर सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना सामंत म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. प्रतिज्ञापत्रात आम्ही या परिस्थितीत परीक्षा घेऊ शकत नाही असे कळवले होते. मात्र तसे करता येणार नाही हे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. परीक्षा न घेण्याचा निर्णय विद्यार्थी आणि पालक यांचा विचार करुन घेतला होता. याबाबत आरोप -प्रत्यारोप करण्यापेक्षा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करुन यातून मार्ग काढावा लागेल, असे उदय सामंत म्हणाले.
सामंत पुढे म्हणाले की, साडे आठ लाख विद्यार्थ्यांच्या भावितव्यासोबतच त्यांच्या आरोग्य आणि जीवनाचा प्रश्न महत्वाचा आहे. परीक्षा न घेण्याबाबत मत असलेल्या इतर राज्यांशी चर्चा करण्याआधी राज्याचे महाधिवक्ता आणि न्याय व विधी विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करू. तसेच, राज्यातील प्रत्येक विद्यापीठात जाऊन मी स्वतः कुलगुरुंशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.